अन्यथा महापालिकेला टाळे ठोकु-कृती समीतीचा इशारा...
कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती आक्रमक.. जल अभियंता श्री.हर्षजीत घाटगे यांना घेराव..!!
कोल्हापूर(प्रतिनिधी) दि.२३-
१९४६ साली बांधण्यात आलेले हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेले कळंबा फिल्टर हाऊस निम्म्या कोल्हापूर शहराची तहान भागवते. गेली अनेक वर्षे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कळंबा फिल्टर हाऊस ची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याबाबत बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने संस्थापक किसनराव कल्याणकर,अध्यक्ष रामेश्वर पतकी, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, पद्माकर कापसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे.शुक्रवारी या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी येऊ शकले नव्हते. यावेळी बी वॉर्ड अन्याय निवड कृती समितीने इशारा देत सोमवारी अधिकारी न आल्यास टाळा ठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापूर महापालिकेचे जलअभियंता इंद्रजीत घाटगे, उपजलअभियंता रावसाहेब चव्हाण आणि कळंबा फिल्टर हाऊस चे राजेंद्र हुजरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित झाले.बी वॉर्ड अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचबरोबर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामुळे कळंबा फिल्टर हाऊसचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.यावेळी या प्रभागातील नगरसेवक दुर्वास कदम, डाॅक्टर सुषमा जरग, विजयसिंह खाडे पाटील, मानसी लोळगे,संतोष जरग यांचीही उपस्थिती होती. यावेळी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या सदस्यांनी जलअभियंता हर्षजित घाटगे यांना संपूर्ण कळंबा फिल्टर हाऊस या परिसराची पाहणी करायला लावून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे कृती समितीचे सर्वच कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी बोलताना अध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी कळंबा फिल्टर हाऊस चे स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ संपूर्ण दुरावस्थेचा पाढा वाचून ही दुरावस्था कधी दुर करणार? अशी विचारणा केली. किसनराव कल्याणकर यांनी तात्काळ सुरक्षारक्षक नेमावेत अशी मागणी केली पद्माकर कापसे आणि माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी अनेक ठिकाणच्या दुरावस्था निदर्शनाला आणून देऊन जलअभियंता यांना धारेवर धरले.यावेळी दुर्वास कदम,विजयसिंह खाडे-पाटील यांनी याबाबत सभागृहांमध्ये मुद्दा उपस्थित केला जाईल आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती बरोबर असून प्रशासनाने लक्ष न दिल्यास याबाबत प्रशासनाला जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल असे स्पष्ट केले.यावर जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी येत्या शुक्रवार पर्यंत डीपीआर तयार करून बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या सदस्यांना आणि प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या बरोबर बैठक घेऊन तात्काळ संरक्षण भिंतीच्या जाळीचे काम सुरू केले जाईल आणि सुरक्षारक्षक नेमण्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला जाईल याची ग्वाही दिली. यावेळी संतप्त झालेल्या बी वॉर्ड अन्याय निवारण समितीचे कार्यकर्ते आणि जलअभियंता हर्षजीत घाटगे यांच्यामध्ये संघर्ष होत असतानाच नगरसेवक दुर्वास कदम सामाजिक कार्यकर्ते सतीश लोळगे आणि संतोष जरग यांनी मध्यस्थी करत लवकरात लवकर काम सुरू करा असे सांगितले. सुधारणांची कामे त्वरित सुरू न झाल्यास बी वॉर्ड अन्याय निवारण समिती स्वस्थ बसणार नाही असा इशारा सर्व कार्यकर्त्यांनी दिला. या आंदोलनामध्ये बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने संस्थापक किसनराव कल्याणकर,अध्यक्ष रामेश्वर पतकी, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, पद्माकर कापसे मुसाभाई शेख, किरण भोसले,सतिश पोवार,प्रशांत डकरे, दीपक म्हेतर ,रोहित गाडीवड्डर, प्रशांत बरगे, सुनील हंकारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments
Post a Comment